जेम्स पार्किन्सन्स नावाच्या जनरल प्रॅक्टिशनरने इ. स. १८१७ मध्ये या आजाराविषयी व्यवस्थित, सविस्तर नोंद सर्वप्रथम केली, म्हणून त्याचे नाव या आजाराला दिले गेले. मेंदूच्या पेशीतून निर्माण होणा-या डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो, असे संशोधन नंतर झाले. काम करित नसताना अवयवांना असणारा कंप, ताठरलेले स्नायू, मंदावलेल्या हालचाली, पुढे झुकून चालण्याकडे कल असल्याने पडण्याची शक्यता वाढणे, ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. याखेरिज चेहे-यावर भाव न दिसणे, आवाज बारिक होणे, हस्ताक्षर बारिक होणे, गिळण्यास त्रास होणे, बद्धकोष्ठ, झोप न येणे, सर्व अंग (विशेषत: स्नायू) दुखणे, खिन्नता, अधिक लाळ सुटणे या तक्रारीही असू शकतात.
हा आजार सांसर्गिक नाही. पण रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने त्यांना इतर संसर्ग पटकन होण्याची शक्यता असते. तसेच एकाच कुटुंबात दोन रुग्ण आढळत असले तरीही एकूण रुग्णांच्या संख्येचा विचार करता हे प्रमाण खूपच कमी असल्याने हा आजार अनुवंशिक नाही असेच मानले जाते.
पार्किन्सन्सचे टप्पे पुढीलप्रमाणे मानता येतील.
- पहिल्या टप्प्यात व्यक्ती सर्व हलचाली, व्यवहार, कामे स्वत:ची स्वत: करू शकते. पण पार्किन्सन्समुळे येणा-या मर्यादा, अडचणी जाणवायला लागलेल्या असतात.
- या टप्प्यात काही विशिष्ट कामांसाठी दुस-याची मदत घेण्याची गरज वाटू लागलेली असते, तरीही बरेच व्यवहार स्वतंत्रपणे होत असतात.
- दुस-या व्यक्तीच्या मदतीची गरज अधिक प्रमाणात जाणवू लागते. विशेषत: बाहेर जाऊन करावयाच्या कामासंदर्भात दुसरी व्यक्ती अथवा मदतनीस बरोबर हवाच असे वाटू लागते. घरातील आवश्यक दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करता येतात, पण तरी त्याबाबत मदत असली तर बरे असे कधीकधी वाटते. बाहेरील कामे स्वतंत्रपणे करण्यास आत्मविश्वास वाटत नाही.
- घरातल्या घरात करावयाच्या कामात सुद्धा निरुत्साह वाटत रहातो. अंघोळीसारखी स्वत:ची आवश्यक दैनंदिन कामेही करण्याचा त्रास वाटू लागतो. अजूनही, कुणाचे सहाय्य घेऊन, आवश्यक तर काठी, वॉकर अशा काही साधनांचा वापर करून घरातल्या घरात हलचाली जमत असतात, केल्या जातात.
- या शेवटच्या टप्प्यात व्यक्ती रुग्ण बनलेली असते. अंथरुणावरून हलूच नये असे वाटायला लागलेले असते. काही करावे असा उत्साहही नसतो. तशी शक्तीही कमी होत चाललेली असते. कधी हलचाल नाही म्हणून भूक कमी, भूक कमी म्हणून खाणे कमी, खाणे कमी म्हणून शक्ती कमी अशा दुष्टचक्रात रुग्ण अडकतो. हलचाल नाही म्हणून स्नायू आखडतात. सर्व नैसर्गिक विधी अंथरुणातच करायची वेळ आली, आणि त्यामुळे बेड-सोअर्स झाले तर रुग्णाची स्थिती दु:खदायक होते.
अशा अंथरुणग्रस्त रुग्ण अवस्थेत शक्यतो न जाणे, आणि कधी क्वचीत अपघातानेही त्या अवस्थेत जायची वेळ आल्यास, पूर्ण प्रयत्नांनिशी त्या अवस्थेतून बाहेर पडणे हे त्या व्यक्तीचे आणि आप्तस्वकीयांचे ध्येय असायला हवे. न्युरॉलॉजिस्ट्कडे व्यवस्थित उपचार घेतल्यास, पथ्ये पाळल्यास आणि मुख्य म्हणजे सकारात्मक रितीने जगल्यास पर्किन्सन्स असलेली व्यक्ती चांगल्या त-हेने जगू शकते